बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीज अदृश्य असली तरी तिचे नियम कधीही माफ करत नाहीत. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी कायम सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले आहे. विद्युत अपघातात कर्मचाऱ्यांचा किंवा कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन पिढ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. त्यामुळे विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
महावितरणच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन रविवारी (१ जून) चिंचवड (पुणे) येथे झाले. यावेळी कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ऑनलाइन खुल्या प्रश्नमंजूषा पोर्टलचे उद्घाटन राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे आणि मुख्य अभियंता सुनील काकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले की, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी राज्यभरात विद्युत सुरक्षेची जनजागरण मोहीम सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महावितरणचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी www.mahadiscom.in या वेबसाइटवर ऑनलाइन खुली प्रश्नमंजूषा सुरू करण्यात आली आहे. यात विद्युत सुरक्षेबाबत अचूक उत्तरे देणाऱ्यांना लगेच ऑनलाइन प्रमाणपत्र मिळणार आहे.
श्री. पवार यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले की, अत्यंत धकाधकीच्या सेवा क्षेत्रात काम करताना विद्युत सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघाताचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, नागरिकांना वीजसाक्षर करण्यासाठी सातत्याने स्थानिक उपक्रम राबवून त्यांच्याशी संवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या ऑनलाइन प्रश्नमंजुषेला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवारी (१ जून) सायंकाळपर्यंत तब्बल ५४ हजार ६५९ कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी यात सहभाग घेऊन ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवले आहेत.