जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सन २०२५-२६ पासून पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान मुराद तडवी यांनी सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर हे ओळखपत्र मिळवून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार, कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी १५ एप्रिल २०२५ पासून शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे, पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना २०२५-२६ च्या मृग आणि आंबिया बहाराकरिता सहभागी होण्यासाठी ‘शेतकरी ओळखपत्र’ नसल्यास विमा योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेअंतर्गत, मृग बहार हंगामात पेरू, मोसंबी, लिंबू, सिताफळ आणि डाळिंब या पिकांना, तर आंबिया बहार हंगामात आंबा, केळी, डाळिंब, पपई आणि मोसंबी या पिकांना हवामान धोक्यांच्या निकषानुसार विमा संरक्षण दिले जाईल. त्यामुळे, जिल्ह्यातील सर्व फळ उत्पादक शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या बदलाची नोंद घेऊन तातडीने आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) अॅग्रीस्टॅक प्रणालीतून प्राप्त करून घ्यावा आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.