भडगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |
धुळे येथे २९ मे रोजी शारदा उर्फ पूजा बागुल हिचा अमानुष छळ करून खून केल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी आज (शुक्रवार, ६ जून २०२५) भडगाव तहसील कार्यालयावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महसूल प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन पूजाच्या कुटुंबीय आणि नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आले.
भडगाव येथील माहेरवाशीण असलेल्या शारदा उर्फ पूजा बागुल (माळी) हिचा तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी अमानुषपणे छळ करून मारहाण केली आणि विषप्रयोग करून संगनमताने खून केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पूजाचा पती कपिल बाळू बागुल हा भारतीय सैन्य दलात नोकरीस असून, प्रज्ञा कर्डीले नामक महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधात पूजा अडसर ठरत असल्याने, घरातील इतर सदस्य, प्रियसी प्रज्ञा कर्डीले आणि इतरांसोबत संगनमत करून तिचा निर्घृण खून केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर, धुळे येथील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे.
पूजाच्या मृत आत्म्यास न्याय मिळावा, यासाठी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. नागरिकांनी प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
१. ही केस धुळे जिल्ह्यातील न्यायालयात न चालवता ती जळगाव येथील फास्टट्रॅक न्यायालयात वर्ग करण्यात यावी.
२. केसचा तपास हा विशेष बाब म्हणून पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात यावा.
३. या केससाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. प्रदीप घरट (पनवेल), अॅड. शिशिर हिरे (मालेगाव) किंवा अॅड. राजन साळुंखे (ठाणे) यापैकी एकाची फास्टट्रॅक न्यायालयात आणि वेळोवेळी अपिलाचे कामी उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात यावी.
४. गुन्ह्यातील मुख्य आरोपी व मयताचा पती कपिल बाळू बागुल याची जंगम व स्थावर मालमत्ता आणि भविष्यात मिळणारी पेन्शनची रक्कम ही त्याचे व मयताचे दोन्ही अपत्ये (चार्वी कपिल बागुल, चैतन्य कपिल बागुल) यांच्या नावे करण्यात यावी. तसेच, ही दोन्ही अपत्ये सज्ञान होत नाही तोपर्यंत त्यांचे पालक म्हणून मयताचे वडील श्री. शिवाजी राघो महाजन यांचे नाव लावण्यात यावे.
५. मुख्य आरोपी भारतीय सैन्य दलात असल्याने आणि स्थानिक राजकीय लागेबांधे असल्याने त्याला धुळे जेलमध्ये व्ही.आय.पी. व्यवस्था पुरवली जात असल्याचा आणि कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाशिवाय दोन्ही वेळेस घरचे जेवण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
६. आरोपीचे राजकीय हितसंबंध आणि पोलीस दलात वजन असल्याने तो धुळे जेलमध्ये राहून साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, म्हणून सदर आरोपीची रवानगी अमरावती किंवा नागपूर येथील सब जेलला करण्यात यावी.
निवेदनावर असंख्य नागरिकांच्या सह्या असून, त्याच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त – नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव आदींना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.
आज शुक्रवारचा बाजार दिवस असतानाही मोर्चा दरम्यान गावात एकच शांतता पसरली होती. बाजार चौक, मेन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वळसा घालून हा आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यात सर्व नागरिक, मजूर, शेतकरी, विविध संघटना, राजकीय पक्ष पदाधिकारी, शिक्षक, डॉक्टर, व्यापारी, कामगार, ठेकेदार, युवक, महिला आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी बोलताना सांगितले की, भारताच्या सैन्यात दाखल असलेला सैनिक अशी घटना करतो याची कल्पनाही केली जात नाही. काही लोकांना सुपारी देऊन त्याने असे धाडस केले असावे. गौंडगाव येथील घटनेला २ वर्ष पूर्ण होऊनही न्याय मिळाला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टचा अर्थ शासनाला कळतो आहे का? अशा घटनेत सहा महिन्याच्या आत निर्णय लागला पाहिजे, अशी मागणी आम्ही स्वतः शासनाकडे करणार आहोत. या घटनेत विष देऊन, हात तोडून मोठी मारहाण करून ताईला संपवण्यात आले. या घटनेचा निषेध करत लवकर न्याय मिळावा, अशी मागणी वाघ यांनी केली.
भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्रीताई अहिरराव यांनी घटनेतील पहिल्या दिवसापासूनच्या घडामोडी कथन करत, या प्रकरणात आपण पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. कोणत्याही महिलेवर असे अत्याचार सहन केले जाणार नाहीत, असे म्हणत त्यांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही सांगितले. यावेळी साहेबराव महाजन, वैशालीताई सूर्यवंशी, युवराज पाटील, नितीन महाजन, मधुकर महाजन, मयत शारदाची बहीण आणि इतर नातेवाईक यांनीही मनोगत व्यक्त केले.