बुलढाणा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा सलग प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ माजी आ. दिलीप सानंदा अखेर काँग्रेसला रामराम ठोकून १२ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, या पक्षप्रवेश सोहळ्याची खामगावात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिलीप सानंदा काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा होती. “जब तक जिंदा हूँ, काँग्रेस का परिंदा हूं,” असे म्हणत ते ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, जेव्हापासून बुलढाण्यातीलच हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहू लागले आहेत, तेव्हापासून जिल्ह्यापासूनच काँग्रेसला मोठी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
१९९९, २००४ आणि २००९ अशी सलग तीन वेळा सत्तेत काँग्रेस असताना माजी आमदार दिलीप सानंदा यांचा मतदारसंघात मोठा दबदबा होता. ते एक अग्रेसिव्ह आणि काँग्रेस पक्षासाठी सतत झटणारे नेते म्हणून पक्षात ओळखले जात होते. त्यांचे इतर पक्षांमध्येही चांगले स्नेहसंबंध आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता, तेव्हा त्यांची आणि सानंदांची गुप्त भेट चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर अमरावतीच्या कार्यक्रमाकरिता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले असता, तेथेही सार्वजनिक व्यासपीठावर सानंदा त्यांच्यासोबत दिसून आले होते.
अलीकडेच, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील काँग्रेसचे निष्ठावंत बाजार समिती सदस्य यांनीही मुंबईत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळेस देखील तिथे माजी आमदार दिलीप सानंदा उपस्थित होते आणि तेव्हापासूनच ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे दिसून आले होते.
मुख्य म्हणजे, ज्या खामगाव मतदारसंघात दिलीप सानंदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, तिथे भाजपची तगडी ताकद आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप असे समीकरण आजवर या मतदारसंघाने पाहिले आहे, तसेच सानंदा विरुद्ध फुंडकर परिवार हा देखील मोठा संघर्ष वेळोवेळी या मतदारसंघात दिसून आला आहे. त्यामुळे आता सानंदा सत्तेच्या वाट्यात सहभागी झाल्यानंतर, खामगावातूनच सध्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेले आकाश फुंडकर हे सानंदांसोबत कसे जुळवून घेतात, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीत, राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.