जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शनीवारी ७ जून रोजी साजरी होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील १६१ उपद्रवी व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना त्यांच्या गावहद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
बकरी ईदचा सण शांततेत पार पडावा आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी, उपद्रवी, समाजकंटक, गुंड प्रवृत्तीचे लोक, तसेच यापूर्वी दोषसिद्धी झालेले आणि गोमांस प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केलेल्या व्यक्तींवर बीएनएस कलम १६३ नुसार कारवाई करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. या प्रस्तावांची छाननी करून, पोलिसांनी १६१ उपद्रवी व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सण काळात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वचक बसेल अशी अपेक्षा आहे.