पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील करंजी बुद्रुक हे गाव आदर्श सरपंच भैय्यासाहेब रोकडे यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रमामुळे विकासाच्या नव्या वाटेवर निघाले आहे. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंचपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून रोकडे यांनी ‘गावाचा विकास हाच माझा ध्यास’ हे उद्दिष्ट समोर ठेवून गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना नुकताच लोकमत लोकनायक पुरस्कारा देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
सरपंच रोकडे यांनी गावातील घटस्फोटित, विधवा आणि वयोवृद्ध माता-भगिनींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रकरणे मंजूर करून मोठा आधार दिला आहे. शासकीय योजनांचा लाभ गावातील प्रत्येक गरजूला मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. घरकूल योजनेचे १६६ लाभार्थी, शेवगा लागवडीचे २२, सागवान लागवडीचे ५, आणि गोठा शेडचे ७ लाभार्थी त्यांच्या प्रयत्नांमुळे लाभान्वित झाले आहेत. विशेष म्हणजे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत तालुक्यातून गावाला प्रथम क्रमांक मिळवून दिला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अनेक शासकीय लाभ मिळाले आहेत.
सार्वजनिक सुविधांच्या बाबतीतही भैय्यासाहेब रोकडे यांनी मोठी प्रगती साधली आहे. एमएसईबी, पारोळा यांच्याकडे पाठपुरावा करून संपूर्ण गावात केबल टाकून वीज तारांमुळे होणारे अपघात, वीज चोरी आणि शॉर्टसर्किटपासून गावाला मुक्त केले आहे. गावासाठी सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, संपूर्ण गावात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी, घरोघरी पाण्याचा जार, संपूर्ण गावातील रस्ते काँक्रिटीकरण, गटारमुक्त आणि कचरामुक्त गाव याकरिता चौकाचौकात डस्टबिनची व्यवस्था करून स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
गावाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करत महादेव मंदिराला पर्यटन ‘क’ दर्जा मिळवून सुसज्ज सभामंडप बांधण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी गाव शिवार रस्ता मंजूर करून तयार करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली स्मशानभूमी सुशोभित करून तेथे पाण्याची सोय आणि वृक्षारोपण करण्यात आले आहे. तरुणांसाठी व्यायामशाळा, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शाळा आणि वाहतुकीसाठी ब्रिटिशकालीन जीर्ण झालेल्या पुलाचा जीर्णोद्धार करून नवीन पूल बांधून घेतला आहे. सिंचन बंधारे बांधून ‘पाणी जिरवा, पाणी आडवा’ योजनेचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
सरपंच रोकडे यांना त्यांच्या या विकासकामांमध्ये ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि ग्रामसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले भैय्यासाहेब रोकडे यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने बिनविरोध सरपंच होऊन करंजी बुद्रुकला एक आदर्श गाव बनवण्याचा ध्यास घेतला आहे.