धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आणि ‘माझी वसुंधरा अभियान’ तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय व पर्यावरण विभागाच्या निर्देशानुसार, धरणगाव नगरपरिषदेने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. यासोबतच शहरात प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन करण्यासाठी कठोर कारवाईही करण्यात आली.
५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी, धरणगाव नगरपरिषदेने जीएस नगर, गांधी मळा तसेच दादाजी कुटीया चोपडा रोड येथील खुल्या जागांवर (ओपन प्लेस) मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. याप्रसंगी उपस्थित नागरिकांसह ‘हरित शपथ’ घेऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांना पर्यावरण संवर्धन करणे, झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
याच मोहिमेअंतर्गत, ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन’ या संकल्पनेवर आधारित प्लास्टिकबंदी मोहीम धरणगाव नगरपरिषदेने प्रभावीपणे राबवली. शहरात प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले, तर प्लास्टिक बंदीबाबत कडक कारवाई करण्यात आली. नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध दुकानांची तपासणी केली. यात तीन दुकानांना दुसऱ्यांदा नियम मोडल्यामुळे प्रत्येकी १०,००० रुपये, तर सात दुकानदारांना प्रत्येकी ५,००० रुपये असा एकूण ६७,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि वसूलही करण्यात आला. याशिवाय, १०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छता निरीक्षक हैबतराव पाटील आणि संतोष बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मुकादम शेख शमशोध्दीन, रामकृष्ण माळी, अण्णा माळी, सागर पचेरवार, शुभम पचेरवार यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे राबवली.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी स्पष्ट केले की, केवळ एका दिवसाच्या कार्यक्रमांनी प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न संपणार नाही. प्लास्टिक प्रदूषण हे आपल्या पर्यावरणासाठी, जैवविविधतेसाठी आणि मानवी आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. असे केल्यास आपण हवामान बदलाचा प्रतिकार करू शकतो आणि जैवविविधतेचा ऱ्हास थांबवू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.