अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निम गावावर सोमवारी (२ जून) दु:खाचा डोंगर कोसळला. तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण निम गाव शोकसागरात बुडाले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चेतन अरुण सुतार (वय ९) आणि हरीश बाळू पाटील (वय १२) अशी या दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी ही मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. नेहमीप्रमाणे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. याच दरम्यान, चेतन सुतारचा मृतदेह तापी नदीत तरंगताना आढळला. यामुळे गावावर शोककळा पसरली.
शोधमोहीम सुरू असताना, दुसरा मुलगा हरीश बाळू पाटील याचा मृतदेह मात्र सोमवारी सापडला नाही. अखेर, मंगळवारी (३ जून) सकाळी हरीशचा मृतदेहही नदीत आढळून आला. या घटनेने निम गावातील वातावरण अधिकच गंभीर झाले आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही मुले नदीकाठी कपडे काढून पोहण्यासाठी उतरली होती. पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नसावा किंवा अचानक आलेल्या प्रवाहामुळे ते खोल पाण्यात ओढले गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच, मारवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, तसेच फिरोज बागवान, संजय पाटील आणि अगोने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दोन निष्पाप बालकांचा असा अकाली अंत झाल्याने निम गावावर स्मशान शांतता पसरली आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.