जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बकरी ईदच्या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी मेहरुण तलाव परिसरात गेलेल्या पाच तरुणांपैकी एका तांबापूरा येथील २३ वर्षीय तरूणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने शनिवारी ७ जून रोजी दुपारी २ वाजता बुडाला होता. रात्रीपर्यंत राबविलेल्या शोध मोहिमेनंतरही त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. अखेर रविवारी ८ जून रोजी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी ७ जून रोजी दुपारी २ वाजता बकरी ईदची सुट्टी असल्याने नदीम शेख त्याचे मेहुणे अझहर खान, मामेभाऊ इरफान शेख, तोहीत खान आणि मित्र मोहसीन खान यांच्यासह मेहरुण तलाव परिसरात गेला होता. उकाड्यामुळे सर्वजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. प्रारंभी नदीम हा काठावर थांबला होता, परंतु नंतर तोही पाण्यात उतरला आणि पोहत असताना खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. मदतीसाठी धावलेले इतर तरुण त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच नदीम पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती एमआयडीसी पोलिस, अग्निशमन विभाग आणि महापालिका यंत्रणेला देण्यात आली. मात्र नातेवाईकांनी प्रशासनावर मदत उशिरा पोहोचल्याचा आरोप केला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता पण नदीम सापडला नाही. रविवारी ८ जून रोजी सकाळी ७ वाजता तलावात नदीमचा मृतदेह तरंगताना आढळून आला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवला. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनास्थळी आमदार सुरेश भोळे, तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह संबंधित अधिकारी दाखल झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.