जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगाम २०२५-२६ दरम्यान शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा खतांचा पुरवठा व्हावा, यासाठी जळगाव जिल्ह्यात युरिया आणि डीएपी खतांचा बफर साठा उभारण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी आज (१२ जून) या बफर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून साठवणूक आणि वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी
या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणधीर सोमवंशी, कृषी विकास अधिकारी श्री पद्मनाभ म्हस्के तसेच महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC) चे विभागीय व्यवस्थापक श्री सुनील इंगळे उपस्थित होते.
साठवणूक आणि वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना
श्रीमती करनवाल यांनी साठवणूक केलेल्या युरिया व डीएपी खतांच्या पिशव्यांवरील माहिती, साठवणूक पद्धती, वितरण व्यवस्था, रेक पॉईंट आणि वाहतूक व्यवस्थेची सविस्तर माहिती घेतली. साठवणूक नियमानुसार सुरक्षित, स्वच्छ आणि योग्य प्रकारे ठेवण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांपर्यंत खताचा पुरवठा वेळेवर, पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन कटिबद्ध
शेतकऱ्यांच्या हितासाठी खत वितरणात कोणताही विलंब होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे श्रीमती करनवाल यांनी यावेळी नमूद केले. या बफर साठ्यामुळे खरीप हंगामात खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.