यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील महसूल मंडळ भालोद अंतर्गत, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन शनिवार, १ जून रोजी डोंगरकठोरा येथील श्री खंडेराव मंदिर ट्रस्टच्या सभागृहात मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत, या शिबिरात विविध विभागांमार्फत एकूण ८८८ लाभार्थ्यांना थेट सेवा प्रदान करण्यात आल्या.
या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अमोल जावळे होते. शिबिराच्या सुरुवातीला यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर सविस्तर प्रकाश टाकत, शासनाचे उद्दिष्ट ‘शासन आपल्या दारी’ हे कसे वास्तवात उतरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे, हे स्पष्ट केले.
शिबिरात उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनीही उपस्थित राहून महसूल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेची प्रशंसा करत, नागरिकाभिमुख सेवा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आ. अमोल जावळे यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘अंत्योदय हीच खरी लोकसेवेची दिशा आहे’ असे सांगितले. “प्रशासनाने शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकतेने सेवा पोहोचवाव्यात, हीच जनतेची अपेक्षा आहे,” असे उद्गार त्यांनी काढले.
शिबिरात प्रदान केलेल्या सेवांचा तपशील: या शिबिरामध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामुळे अनेकांना शासकीय कामांसाठी करावी लागणारी धावपळ थांबली.
महसूल विभाग: जिवंत ७/१२: १५२, ई-हक्क नोंदणी: १२८, दुरुस्ती: १९
मतदार यादी अद्ययावतीकरण: फॉर्म ६: २२, फॉर्म ७: १३, फॉर्म ८: ४, संजय गांधी योजना (DBT लाभार्थी): १५२, आरोग्य तपासणी: ५४, शिधा पत्रिका लाभ: ८४,
सेतू केंद्राद्वारे विविध दाखले: १८३- उत्पन्न: ६६, जातीचे: ७२, वय/रहिवास: ४५, लेक लाडकी, जननी सुरक्षा, ICDS योजना: ४३
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गवई यांनी केले, तर आभारप्रदर्शन नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी केले. या शिबिरामुळे ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले असून, अशा शिबिरांची सातत्याने गरज असल्याचे मत नोंदवले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा आणि सेवांचा लाभ त्यांच्या घराघरात जाऊन मिळत असल्याने प्रशासनाबद्दल सकारात्मक प्रतिमा तयार होत आहे.