जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या ‘पुनर्रचना वितरण क्षेत्र योजना’ (RDSS) अंतर्गत जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या कृषी फीडर विभक्तीकरण प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, अडचणी आणि पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांची टक्केवारी, अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी आणि तालुकानिहाय कामांच्या नियोजनावर विस्तृत चर्चा झाली. राज्यमंत्री खडसे यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, चालू कामांना तातडीने गती द्यावी आणि अंमलबजावणीतील अडथळ्यांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच, स्थानिक प्रशासन, महावितरण आणि जनप्रतिनिधी यांच्यात समन्वय वाढवून निश्चित वेळेत प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, असेही त्यांनी नमूद केले. या योजनेमुळे शेतीसाठी वेळेवर आणि योग्य दाबाने वीज मिळाल्याने उत्पादनात वाढ होऊन शेती फायदेशीर ठरेल, असेही खडसे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचा प्रगती अहवाल सादर करत उर्वरित कामांसाठी कालबद्ध आराखडा मांडला. प्रत्येक तालुक्यातील अडथळ्यांवर उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना निश्चित वेळेत आणि अखंड वीजपुरवठा शक्य होणार असून, यामुळे शेतीला मोठी चालना मिळेल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.