रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मौजे कोचूर खुर्द येथील सरपंचपदावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव असलेल्या जागेवर सरपंचपदी निवडून आलेल्या ज्योती संतोष कोळी यांना यापूर्वी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. मात्र, आता महाराष्ट्र शासनाच्या नवीन आदेशानुसार त्यांना पुन्हा सरपंचपद बहाल करण्यात आल्याने, ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई तायडे यांच्यासह इतर सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ज्योती कोळी यांनी अस्तित्वात नसलेल्या ‘एसटी टोकरे कोळी’ जातीचा बनावट दाखला सादर करून निवडणूक लढवल्याचा आणि तात्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई तायडे यांनी यापूर्वी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. ज्योती संतोष कोळी यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे त्यांना पदावरून अपात्र करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या सुनावणीनंतर तत्कालीन जिल्हाधिकारी, जळगाव यांनी ज्योती संतोष कोळी यांना अपात्र घोषित केले होते.
तक्रारदार सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जात वैधता पडताळणी समिती, धुळे यांच्याकडे तात्कालीन तहसीलदार, जळगाव यांच्याकडून मिळालेला जातीचा दाखला बनावट असल्याचे लेखी पुराव्यानिशी कळवले आहे, कारण जळगाव तहसीलदारांकडून असा कोणताही दाखला देण्यात आलेला नाही. ज्योती संतोष कोळी यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि अस्तित्वात नसलेल्या जातीच्या बनावट प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याबद्दल त्यांच्यावर ४२० सह फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नुकत्याच महाराष्ट्र शासनाने ३० एप्रिल रोजी पारित केलेल्या नवीन आदेशानुसार, अपात्र ठरवण्यात आलेल्या ज्योती कोळी यांना नव्याने सरपंचपद बहाल करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आदेशानंतर ज्योती कोळी यांनी पुन्हा सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र, सदस्यांचा आरोप आहे की, त्यांनी आपल्या निवडणूक शाखेमध्ये निवडणुकीत अस्तित्वात नसलेला जातीचा बनावट बोगस दाखला जोडून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामपंचायत विभाग यांची अस्तित्वात नसलेल्या बोगस दाखल्यावर निवडणूक लढवून फसवणूक केल्याप्रकरणी ४२० सह गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई घनश्याम तायडे, कविता किशोर पाटील, गणेश ज्ञानेश्वर महाजन, प्रशांत बाबुराव तायडे, यांच्या सह्या असलेल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे योग्य न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. जर सात दिवसांत न्याय मिळाला नाही, तर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. या घटनेमुळे कोचूर खुर्द गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.