रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।रावेर येथील स्थानकावर दानापूर-पुणे एक्सप्रेस आणि जम्मू-तवी-पुणे झेलम एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाम पवित्रा घेतला असून, शुक्रवारी रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांच्या भेटीत निवेदन सादर करत मागणी केली. जीएम मीना यांनी यावेळी या मागणीसंदर्भात सकारात्मक आश्वासन दिले.
यापूर्वीही भुसावळ विभागाच्या डीआरएम इति पांडे यांची भेट घेऊन हीच मागणी करण्यात आली होती. मात्र यावेळी जीएम स्वतः भुसावळ दौऱ्यावर आले असताना दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रावेरमधील पदाधिकाऱ्यांनी थेट भेट घेऊन पुन्हा निवेदन दिले. संजय बुवा, रजनीकांत बारी, घनश्याम हरणकर, नाना मोची, नितीन महाजन, पवन शिरनामे, विजय बारी, चंदू नेहेते आदी दिव्यांग पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
रावेर हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण असून केळी उत्पादनात देशात अग्रस्थानी आहे. दररोज उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात केळी रेल्वेमार्गे पाठवली जाते. या मार्गावरून रेल्वे प्रशासनाला मोठा महसूल मिळतो. मात्र पुण्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या दोन गाड्यांना थांबा नसल्यामुळे स्थानिक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
सध्या रावेरहून पुण्याकडे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांस्तव दररोज सुमारे १२०० ते १५०० प्रवासी जातात. मात्र रेल्वे गाड्यांना थांबा नसल्यामुळे खासगी बससेवा आणि दोनच एसटी बसेसवर त्यांना अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांना ९०० ते १००० रुपये खर्च तसेच वेळेची हानी सहन करावी लागते. परिणामी खासगी बस व्यवसायिकांना दररोज दहा लाखांहून अधिक उत्पन्न मिळत असताना रेल्वे महत्त्वाच्या महसुलापासून वंचित राहत आहे.
याचसोबत, पूर्वी सुरू असलेली इटारसी-भुसावळ पॅसेंजर ट्रेन बंद झाल्यामुळे सकाळच्या वेळात प्रवाशांना जळगाव व भुसावळकडे जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेली मेमो एक्सप्रेस पहाटे धावत असून ती लोकांना उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान ही गाडी सुरू करण्यात यावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रजनीकांत बारी, संजय बुवा, घनश्याम हरणकर, पवन शिरनामे, विजय बारी, नाना मोची, नितीन महाजन, चंद्रकांत नेहेते यांनी रेल्वे जीएम यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी लावून धरली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व डीआरएम इति पांडेही उपस्थित होते.