यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीने आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणासाठी ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबवण्यात येणार आहे. १५ जून ते ३० जून या कालावधीत ही विशेष जनजागृती मोहीम जिल्ह्यात सुरू होईल. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ११२ आदिवासी बहुल गावांमध्ये विविध शिबिरे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अभियानाचा मुख्य उद्देश आणि व्याप्ती
या अभियानाचा मुख्य उद्देश आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ थेट त्यांच्या गावपातळीवर पोहोचवणे हा आहे. यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून आरोग्य, पोषण, रोजगार, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा एकूण १७ विभागांमार्फत सेवा पुरवण्यात येणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा (२७), यावल (१८), रावेर (१८), मुक्ताईनगर (०६), भुसावळ (०४), जळगाव (१६), एरंडोल (०३), धरणगाव (०३), अमळनेर (०५), चाळीसगाव (०२), पाचोरा (०१) व जामनेर (०९) अशा एकूण ११२ गावांमध्ये हे उपक्रम राबविले जातील.
शिबिरांमधून मिळणार विविध सेवा
या विशेष शिबिरांमधून नागरिकांना अनेक महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये आधारकार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड तयार करणे, पीएम किसान योजना, किसान क्रेडिट कार्ड व जनधन खाते उघडणी ई-सेवा सुविधा यांचा समावेश आहे. यासोबतच, सिकलसेल आजारावरील जनजागृती, विविध विभागांमार्फत योजनांचे लाभ आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांचे वाटप केले जाईल. आगामी पाच वर्षांत आदिवासी बहुल गावांमध्ये पक्के रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा, वीज, मोबाईल मेडिकल युनिट, उज्ज्वला गॅस, अंगणवाडी, पोषण, कौशल्य विकास, कृषी, मत्स्यव्यवसाय, पर्यटन विकास, शासकीय निवासी शाळा व वसतिगृहांची उभारणी यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
विशेष दिवस आणि प्रशासनाचे आवाहन
या मोहिमेअंतर्गत १९ जून रोजी ‘सिकलसेल डे’ निमित्त आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, तर २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ निमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये योगविषयक उपक्रम राबवले जातील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल (भा.प्र.से.) यांनी दिली. या अभियानामुळे आदिवासी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांनी व्यक्त केला. प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी आदिवासी सामाजिक संस्था, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.